मुंबईत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १७ एप्रिलला ईशारा आंदोलन

मुंबई प्रतिनिधी: बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे शिक्षकेतर व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ईशारा आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने शासनातील संबंधित अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेऊन तसेच पत्रव्यवहार करूनही अनेक प्रश्न अद्याप प्रलंबितच राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष देविदास पंडागळे आणि सरकार्यवाह सूनिल खाडे यांनी सांगितले.

या आंदोलनात प्रमुख मागण्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकेतर व शिक्षकांचे थकीत वेतन तात्काळ देणे, बंद पडलेल्या शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन मंजूर करणे, प्रलंबित वेतन देयके मान्य करणे, शालार्थ आयडी प्रस्तावांना लवकर मंजुरी देणे तसेच शिक्षण सेवकांच्या प्रस्तावांना तत्काळ मान्यता देणे या मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील इतर प्रलंबित प्रश्नही जलद गतीने मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर ईशारा आंदोलन दिनांक १७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा संघटनेचा प्रयत्न असून, संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



